पाणी जोडणीसाठी प्लंबरकडून झोपड्पट्टीमधील रहिवाशांची लूटमार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 November 2017

पाणी जोडणीसाठी प्लंबरकडून झोपड्पट्टीमधील रहिवाशांची लूटमार


जल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने प्लंबरचा धंदा तेजीत -
मुंबई । प्रतिनिधी 12 Nov 2017 -
भारतीय संविधानात पाणी हा नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले आहे. पाणी हा मूलभूत अधिकार असल्याने पाण्यापासून कोणत्याही नागरिकाला वंचित ठेवू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या निर्णयात म्हटले आहे. तरीही मुंबईमधील झोपडपट्ट्यांमधून नागरिकांना पाण्याचे कनेक्शन देतांना प्लंबरकडून लूटमार केली जात आहे. पाणी जोडणी देताना प्लंबर आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने वसूल करण्यात येणारी रक्कम देणे झोपड्पट्टीमधील नागरिकांना शक्य नसल्याने गोवंडी - शिवाजी नगर येथील 50 टक्के रहिवासी पाणी जोडणीपासून वंचित राहिले आहेत. पालिकेच्या जल विभागातील अधिकारीही यांत मिळालेले असल्याने प्लंबरचा हा धंदा तेजीत सुरु आहे.

मुंबईत राहतो त्या सर्वांना पाण्याचा अधिकार आहे, या उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पालिका पाच जण किंवा त्यापेक्षा अधिक कुटुंबाच्या गटाला सरसकट पाणी जोडणी देते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर पालिकेने परवाना दिलेल्या प्लंबरच्या शिफारशीचा सही, शिक्का घेऊन आवश्यक कागदपत्रासह अर्ज पालिकेच्या संबंधित विभागाला सादर करावा लागतो. पालिकेकडे अनामत रक्कम व इतर शुल्क मिळून 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. ही प्रक्रिया रहिवाशांनी करायला हवी, मात्र प्लंबर ही सर्व प्रक्रिया करून पाणी जोडणीसाठी रहिवाशांकडून 25 ते 28 हजार रुपये घेऊन लूटमार करीत असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या आहेत.

ही सर्व प्रक्रिया रहिवाशांना करणे सहज शक्य आहे. प्लंबरची हजारेक रुपयांची फी देऊन पालिकेकडे आवश्यक कागदपत्रे जमा केल्यास जोडणी करून घेता येते. ही जोडणी पालिकेच्या संबंधीत कर्मचाऱ्यानी करायला हवी मात्र तसे न करता प्लंबरकडून केली जाते. अगदी ऑनलाइन अर्जासह सर्व प्रक्रिया प्लंबरच करतात व घरबसल्या पाणी जोडणी करून मिळते. त्यासाठी मात्र 10 ते 12 हजार रुपयाऐवजी 25 ते 30 हजार रुपये प्लंबरना मोजावे लागतात. या सर्व प्रक्रियेत संबंधित अधिकारी, स्थानिक दलाल यांनाही द्यावे लागते असे प्लंबरकडून रहिवाशाना सांगितले जाते. गोवंडी शिवाजी नगरच्या झोपडपट्टीतील 50 टक्के रहिवासी पाणी जोडणीविना आहेत. प्लंबरना 25 हजार रुपये देणे शक्य नसल्याने पाणी जोडणी करून घेता येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असते, कित्येकवेळा पाणी जास्त पैसे मोजून विकत घ्यावे लागते असे येथील रहिवाशांनी सांगितले.

पाणी जोडणीसाठी पालिकेकडून आकारण्यात येणारे अधिकृत शुल्क संबधित रहिवाशांनी पालिकेत येऊन जमा करावे, असा नियम आहे. मात्र दुप्पट पैसे घेऊन ही सर्व प्रक्रिया प्लंबरकडून केली जाते. पालिकेचा यावर अंकुश राहिलेला दिसत नाही. अशा प्लंबर सोबत मीटिंग घेऊन याची समज द्यावी. गोवंडी - शिवाजी नगर येथील बहुतांशी रहिवासी यामुळेच पाणी जोडणीविना आहेत. त्यामुळे नियमानुसार शुल्क आकारल्यास त्यांना जोडणी घेणे शक्य होईल असे अपनालाय संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक ज्ञानेश्वर तरवडे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS