
मुंबई । प्रतिनिधी 12 Nov 2017 -
मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत फुकट्या प्रवाशांविरोधात राबविलेल्या मोहिमेत विनातिकीट आणि बेकायदा पद्धतीने सामानाची वाहतूक करणाऱ्यांकडून तब्बल 100 कोटी 67 लाखांचा दंड वसूल केला आहे.मध्य रेल्वेकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या सात महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात 19 लाख 82 हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यातून 100 कोटी 67 लाखांचा दंड वसूल केला आहे. गेल्यावर्षी याच सात महिन्यांमध्ये 16 लाख 37 हजार गुन्ह्यांची नोंद होऊन 80 कोटी दोन लाखांचा दंड वसूल केला होता. गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या कारवाईबाबतची तुलना केल्यास यंदा 25.81 टक्क्यांने वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये 3.39 लाख गुन्ह्यांची नोंद असून, 17 कोटी 66 लाखाचा दंड वसूल केला आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये 2.88 लाख गुन्हे नोंदवले होते. त्यातून 14 कोटी 51 लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यातील कारवाईची तुलना केल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा 21.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे.