
मुंबई 7 Nov 2017 -
महाराष्ट्रातल्या राज्य महामार्ग, राज्यमार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरु आहे. येत्या १५ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करणार, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. त्यासाठी मंत्रालयातील कार्यालयात वॉर रूम तयार केली असून त्याद्वारे राज्यातील कामांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी उभारण्यात आलेल्या 'संपूर्ण खड्डेमुक्ती वॉर-रूम'च्या पाहणीनंतर पाटील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 'संपूर्ण खड्डेमुक्त वॉर-रूम'चा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. संपूर्ण राज्यातील खड्डेमुक्तीसाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीची निविदा काढण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक १० किमी रस्त्याची कामे २ वर्षे कालावधीसाठी संबंधित कंत्राटदारास देण्यात येणार आहे. या कालावधीत या रस्त्याची जबाबदारी त्या कंत्राटदारांची असणार आहे.
राज्यात होणाऱ्या कामांची माहिती ऑनलाईन जिल्हानिहाय तसेच विभागनिहाय या वॉर रूममध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा रोजच्या रोज घेतला जाणार आहे. यामध्ये केलेल्या कामाबरोबरच त्याची छायाचित्रेही अपलोड होत आहेत. त्यामुळे खड्ड्याची स्थिती व खड्डे भरताना आणि भरल्यानंतरची स्थिती ही माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. खड्डे भरण्याच्या कामाची रिअल टाईम माहिती आता मिळणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी नाशिक व औरंगाबाद येथील कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, येथील राज्य महामार्ग, राज्यमार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांवरील कामकाजाचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.