काँग्रेस कार्यकर्ते करणार मुंडण -
मुंबई । प्रतिनिधी 6 Nov 2017 -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य आणि गरीब जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. स्वत:चेच पैसे बँकेतून काढताना 115 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसपक्षासह अनेक संघटना काळा दिवस पाळत आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (8 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता आझाद मैदान येथे काँग्रेस पक्षाद्वारे मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी नोटबंदीत मरण पावलेल्यांचे स्मरण म्हणून कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते मुंडण करून भाजप सरकारचे श्राध्द घालणार असल्याची माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नोटबंदीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 115 निष्पाप लोकांसाठी जुहू बीचवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली असून सर्वांना मेणबत्ती पेटवून श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निरुपम यांनी दिली. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे आर्थिक नुकसान झाले असून त्या संदर्भात गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017 रोजी नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे जे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यासंदर्भात भुलेश्वर येथे 'नोटबंदी आणि जीएसटी, क्या खोया ? क्या पाया ?' याबाबत परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. या परिसंवादाला मुंबईतील सर्व हिरे, दागिने, लोखंड, केमिस्ट अशा सर्व स्तरातील व्यापारी व उद्योजक उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या सर्वांशी संवाद साधणार आहेत. यावेळी माजी खासदार मिलिंद देवराही उपस्थित राहणार असल्याचे निरुपम यांनी यावेळी सांगितले.