मुंबई । प्रतिनिधी - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असणारी अखंड श्रध्दा, नितांत आदर आणि अखंड प्रेम यापोटी संपूर्ण देशभरातून आलेल्या लाखो अनुयायांनी दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली. या सर्व अनुयायांना आवश्यक त्या विविध नागरी सेवा सुविधा देण्याचे कार्य बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सक्षमपणे करण्यात आले. या सेवा सुविधांतर्गत वैद्यकीय सेवा सुविधा देखील पुरविण्यात आल्या. महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व महापालिकेची प्रमुख रुग्णालये यांनी संयुक्तपणे कार्यरत राहून ८ हजार ६२९ अनुयायांची तपासणी करुन त्यांच्यावर आवश्यक ते औषधोपचार केले.
महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व प्रमुख रुग्णालये यांच्याद्वारे दि. ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधी दरम्यान ३ ठिकाणी तात्पुरते वैद्यकीय उपचार कक्ष सुरु करण्यात आले होते. यामध्ये चैत्यभूमी, शिवाजी पार्क, सूर्यवंशी सभागृह या तीन ठिकाणांचा समावेश होता. या तिन्ही ठिकाणी ६ हजार ९३५ अनुयायांवर आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले. यामध्ये ३ हजार ५३६ पुरुष, ३ हजार २३६ महिला आणि १६३ बालकांचा समावेश होता.
याच कालावधी दरम्यान पडलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील महापालिकेच्या ७० शाळांमध्ये अनुयायांच्या निवा-याची व्यवस्था करण्यात आली होती. या शाळांच्या लगतच्या परिसरातील ११ मनपा शाळांमध्ये देखील वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या शाळांमध्ये निवा-यास असणा-या अनुयायांपैकी १ हजार ६९४ अनुयायांवर आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले. यामध्ये ८३४ पुरुष, ८३३ महिला आणि २७ बालकांचा समावेश होता.
या वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व 'प्रमुख रुग्णालये' येथील १४३ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये ६९ डॉक्टरांसह ७४ नर्स, सहाय्यक इत्यादी मनपा कर्मचा-यांचा समावेश होता. याबाबत संबंधित वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या तात्पुरत्या दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या बहुसंख्य रुग्णांना सर्दी, अंगदुखी चा त्रास होता.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून मुंबईत येणा-या लाखो अनुयायांना अधिकाधिक चांगल्या सोयी-सुविधा देता याव्यात व त्यांचे मुंबईतील वास्तव्य अधिकाधिक सुखकर व स्मरणीय व्हावे, यासाठी दि. ४ ते ६ डिसेंबर दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका अहोरात्र कार्यरत होती. महापरिनिर्वाण दिनाच्या किमान तीन महिने आधीपासून या सर्व बाबींचे नियोजन करण्यात आले होते.