राणी बागेच्या विकासाचा भूखंड विकासकाच्या घशात -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईतील भायखळा येथील बंद पडलेल्या मफतलाल मिलमधील अर्धी जागा राणीबागच्या विकासासाठी आरक्षित आहे. संबंधित भूखंड पालिका ताब्यात घेण्यास गेली असता मफतलाल कंपनीच्या मालकाने आपली सुरक्षा यंत्रणा आत घुसवून या जागेवर मफतलाल मिलच्या मालकाने कब्जा केला आहे. या सात एकर भूखंडावर विकासकाने टॉवरचे बांधकाम सुरु केले आहे. संबंधित भूखंडही विकासकाने आपल्या नावावर केला आहे, असा आरोप नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी सुधार समितीत हरकतीच्या मुद्दाद्वारे करीत पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
भायखळा येथील प्लॉट नंबर 593 वरील 14 एकर जमिनी पैकी 7 एकर जागेवर मिल कामगार कामगारांच्या घरासाठी व 7 एकर जागा जिजामाता उद्यानातील प्राणी संग्रहालयासाठी राखीव होती. मात्र ही 7 एकर जागा नावावर करून या जागेचा मफतलालने ताबा घेऊन न्यायालयात स्टे आणला. ही जागा पेननसुला विक्री केली असून येथे असलेली पालिकेची सुरक्षा काढून तेथे आपली सुरक्षा ठेवत विकासकाने बांधकामही सुरु केले आहे. या सर्वामुळे राणीबागेच्या विकासाचे काम थांबले आहे. असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी बुधवारी सुधार समितीत करून प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड केला. यामुळे उद्यानाचे कामही रखडले असल्याचे सांगत रहाटे यांनी महापालिकेचा विधी विभाग काय करीत होता? असा सवालही प्रशासनाला विचारला. मफतलालने पालिकेकडे जागा हवी असल्यास टीडीआर किंवा 600 कोटी रुपयाची मागणी केली असल्याचा आरोपही रहाटे यांनी सुधार समितीत केला. पालिकेचा या हलगर्जीपणा विरोधात शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.