
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील उर्दू शिक्षकांना गेल्या दोन वर्षात नियुक्ती पत्र देऊनही नोकरीवर रुजू करून घेण्यात आलेले नाही. याचा निषेध करत गुरुवारी समाजवादी पक्षाच्या वतीने सभागृहातून सभात्याग करण्यात आला. तसेच सभागृहाबाहेर पालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेने सन २०१५ मध्ये ४२८ पदांची भरती केली होती. या भरतीच्या माध्यमातून उर्दू वगळता इतर सर्व भाषांमधील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. उर्दू भाषिक ८८ शिक्षकांना या भरती प्रक्रियेवेळी नियुक्ती पत्र देण्यात आली. या उमेदवारांची आरोग्य तपासणी सुरु असताना एका भाजपाच्या नगरसेविकेने भरतीच्या चौकशीची मागणी केली. उर्दू भाषिक शिक्षकांच्या भरतीची चौकशी गेले दोन वर्षे सुरु आहे. उर्दू शिक्षकांची भरती करावी म्हणून समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख गेले दोन वर्षे महापौरांकडे आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत आहे. मात्र भरती करण्यास दुर्लक्ष केले जात असल्याने या मुद्द्यावर पालिका सभागृहात बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी शेख यांनी महापौरांकडे केली. महापौरांनी शेख यांना बोलण्यास परवानगी नाकारल्याने उर्दूचा आवाज दाबला जात आहे, उर्दू शिक्षकांची भरती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाच्या रईस शेख, आयेशा शेख, आयेशा खान, अख्तर कुरेशी, रुकसाना सिद्दीकी, सायरा आझमी या नगरसेवकांनी सभात्याग केला. सभात्यागानंतर सभागृहाबाहेर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनावेळी महापौर, सत्ताधारी पक्ष व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. समजावादी पक्षाच्या या आंदोलनामध्ये राष्ट्र्रवादी पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव, नगरसेवक कप्तान मलिक व एमआयएमचे नगरसेवक शाहनवाज शेख सहभागी झाले होते. या अंदोलना नंतर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांची भेट घेतली असता महापौरांनी एका महिन्यात उर्दू शिक्षकांना नोकरीत सामवून घेतले जाईल असे आश्वासन दिले.