आंबेडकरी संघटना मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांना जाब विचारणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2017

आंबेडकरी संघटना मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांना जाब विचारणार


महापरिनिर्वाण दिनी ॲप आणि संकेतस्थळाचे उदघाटन भोवणार -
मुंबई । अजेयकुमार जाधव -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळाचे व ॲपचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दुःखाचा दिवस असल्याचा विसर मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना पडला आहे. दुःखाच्या दिवसाचे भान न ठेवता मुंबई महापालिकेच्या ॲप आणि संकेतस्थळाचे उदघाटन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालिका आयुक्त अजोय मेहता यांना घेराव घालून किंवा मोर्चा काढून जाब विचारला जाणार आहे. तशी आंबेडकरी संघटनांनी तयारी सुरु केली आहे. तसेच शिवाजी पार्कमध्ये असलेल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पालिकेने शिवाजी पार्क परिसरातून महापरिनिर्वाण दिनी ७० टन कचरा उचलल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी पालिका आयुक्तांना जाब विचारला जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महारपरिनिर्वाण दिन हा दुःखाचा दिवस म्हणून देशभरातून लाखो अनुयायी दादर चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबाना अभिवादन करतात. या दिवशी सरकारी कार्यालयांमधूनही बाबासाहेबाना आदरांजली वाहिली जाते. यावर्षी महापरिनिर्वाण दिना आधीच ओखी वादळाचा इशारा दिला होता. तरीही पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आंबेडकरी अनुयायांचे हाल झाले होते. अश्या परिस्थितीत अनुयायांना वाऱ्यावर सोडून पालिकेच्या संकेतस्थळाचे व ॲपचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याबाबत पालिका सभागृहात भाजपा वगळता सर्व पक्षीय नगरसेवकांनी निषेध व्यक्त करून आयुक्तांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र शेवटच्या क्षणाला महापौरांनी पुन्हा असे प्रकार करू नये असे निर्देश आयुक्तांना देऊन प्रकरणावर पडदा पाडण्यात आला. लिकेतील नगरसेवकांनी या प्रकरणावर पडदा टाकला असला तरी आंबेडकरी संघटना याप्रकरणावरून संतप्त झाल्या आहेत.

तसेच महापालिकेने महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरातून ७० मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा केला आहे. असा दावा करताना शिवाजी पार्क परिसरात पावसाने चिखल झाल्याने यावर्षी अनुयायी नव्हते. तसेच ओखी वादळामुळे समुद्र किनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. जे अनुयायी अभिवादन करायला आले होते त्यांच्याकडून "आम्ही आंबेडकरवादी" संघटना कचरा गोळा करून काळ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये जमा करत होती. इतरही संघटना स्वच्छता राखण्यास मदत करत होत्या. यामुळे परिसरात कचरा फारच कमी प्रमाणात झाला होता. याकडे पालिकेने दुर्लक्ष करत ७० मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा केल्याने आंबेडकरी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वादळामुळे समुद्र किनारी आलेला कचरा सुद्धा पालिका आंबेडकरी अनुयायांनी केला असल्याचे म्हणत असल्याने त्याविरोधातही संताप पसरलेला आहे. याबाबतही पालिका आयुक्तांना जाब विचारला जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS