पुणे- “विरोधी मतांमध्ये विभाजन केल्याशिवाय २०१९ मध्ये निवडणूक जिंकता येणार नाही, याची जाणीव भाजपला झाली आहे. त्यामुळे समाजात फूट पाडण्यासाठी, जातीय तणाव, वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असावा,’ असा अाराेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला अाहे. म्हणूनच या दंगलीमागचे सूत्रधार समोर आले पाहिजेत,’ अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. समाजात भांडण लावून भाजप आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी धडपडत आहे. आगामी निवडणुकीपर्यंत असेच प्रकार घडत राहतील,’ अशा शब्दात चव्हाण यांनी सडकून टीका करून मुख्यमंत्री आणि सरकारच्या हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
चव्हाण म्हणाले, की २०१४ मध्ये भाजपला देशात ३१ टक्के मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील ६९ टक्के मते एकत्र राहिली तर २०१९ मध्ये भाजप जिंकू शकणार नाही. याची झलक गुजरात निवडणुकीतच दिसली. म्हणून विविध समाज घटकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे. हे समजण्यासाठी फार राज्यशास्त्र येण्याची गरज नाही. दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येणार, याची सरकारला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. तेथील दंगलीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्यावरून पहिला दगड कोणी फेकला, पहिली ठिणगी कोणी टाकली यामागचा सूत्रधार सरकारने शोधावा’, असे ते म्हणाले. ‘परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरले. सर्व व्यवस्था हाताशी असताना सरकारने काहीच कारवाई केलेली नाही असा आरोप भावना यांनी केला.