मुंबई - समुद्रात जाणारा तरंगता कचरा रोखण्यासाठी चौपाट्यांसह पाणी तुंबणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी आता फ्लोटिंग बुम्स बसवले जाणार आहेत. यामुळे समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण रोखले जाणार आहे. शिवाय पाण्याचा निचराही वेगाने होणार आहे. नालेसफाईच्या कामांची माहिती देताना स्थायी समितीत प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.
मुंबईतील नालेसफाई केली जात असली तरी प्लॅस्टिक, थर्माकोलसारख्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याच्या घटना घडतात. त्यामुळे हा कचरा रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत, अशी विचारणा स्थायी समितीत सदस्यांनी केली. यावर उत्तर देताना तरंगत्या कचऱ्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतल्याची माहिती देण्यात आली. फ्लोटिंग बुम्समुळे ८० % तरंगता कचरा समुद्र, नद्या आणि जलवाहिन्यांमध्ये जाण्यापासून रोखला जाईल असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला. फ्लोटिंग बुम्स पोयसर, ओशिवरा, मिठी, दहिसर, लवग्रोव, ईर्ला या ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर पुढील काळात आवश्यकतेनुसार फ्लोटिंग बुम्सची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.