महिलांना सौर उर्जेवरील उपकरणे जोडण्याचे प्रशिक्षण मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2018

महिलांना सौर उर्जेवरील उपकरणे जोडण्याचे प्रशिक्षण मिळणार


मुंबई - महिलांना सौर उर्जेवरील उपकरणे जोडण्याचे आणि बसवण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, या ठरावाच्या सूचनेव्दारे केलेल्या मागणीला पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता महिलांना प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

मुंबई महापालिका तर्फे गरजू महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शिवणकाम, लोणचे , मसाले बनविण्याचे आणि ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देण्यात येते. परंतू या प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरु करण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण मिळूनही व्यवसाय सुरु करता येत नाही. त्यामुळे महिलांना सौर उर्जेवरील उपकरणे जोडण्याचे आणि बसवण्याचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी नगरसेविका लीना देहरेकर- पटेल यांनी केली होती. सौर उर्जेवरील दिवे गृहनिर्माण सोसायट्या तसेच झोपडपट्ट्यांमध्ये लावता येतील. झोपडपट्ट्यामध्ये काही गल्लीबोळात वीज पोहचवता येत नाही. अशा ठिकाणीही सौरऊर्जेचा प्रकाश मिळेल. तसेच सौर ऊर्जेपासून पंखे चालवता येतील, मोबाईलही चार्जिंगही करता येईल. त्यामुळे लोकांना वीज मिळेल व पैशाचीही बचत होईल यासाठी महिलांना सौर उर्जेवरील उपकरणे जोडण्याचे आणि बसवण्याचे प्रशिक्षण द्यावे, त्यामुळे महिलाना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल. असे त्यांनी ठराव्याच्या सूचनेत म्हटले होते. त्यावर पालिकेच्या सहायक आयुक्त (नियोजन) विभागांतर्गात महिलांना सौर उर्जेवर चालणारी उपकरणे जोडण्याचे आणि बसविण्याचे प्रशिक्षण केंद्र शासनाच्या वैद्यकीय मापन उपयंत्र अभिकल्प संस्थान , चुनाभट्टी येथे देण्याची व्यवस्था आहे. या प्रशिक्षणासाठी लाभार्थी इच्छुक नसल्यामुळे या आर्थिक वर्षात यासाठी तरतूद केली नाही. येत्या आर्थिक वर्षात लाभार्थी इच्छुक असल्यास व प्रशिक्षण घेण्याची तयारी दाखविल्यास जेंडर बजेटच्या रोजगाराभिमुख प्रशिक्षण या घटकांतर्गत तरतूद करण्यात येईल, असा अभिप्राय आयुक्तांनी दिला आहे. मुंबईमध्ये चुनाभट्टी येथे सौर उर्जेवरील उपकरणे जोडण्याचे आणि बसवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण केंद्र पूर्व उपनगरातील महिलांना जवळ आहे. शहरातील आणि पश्चिम उपनगरातील महिलांना मात्र याठिकाणी यायला खर्चिक आहे. तसेच वेळही लागतो. त्यामुळे मुंबईत तीन ठिकाणी प्रशिक्षण द्यायला हवे असे देहरेकर- पटेल यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad