बंदला हिंसक वळण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2018

बंदला हिंसक वळण


मुंबई -- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने बुधवारी पुकारलेला बंदला पूर्व उपनगरांत काही ठिकाणी हिंसक वळण लागले. उपनगरात बंद मानखुर्द येथे बेस्टची एक बस जाळण्यात आली असून, एकूण २५ बसेसचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरांतील महामार्गांसह अन्य रस्त्यांवरील वाहतूकही थंडावली होती. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी येथे रेल रोको करण्यात आला तर, नवी मुंबईतील हिंसक आंदोलनामुळे ट्रान्सहार्बर सेवा दिवसभरात साडेचार तासांसाठी बंद पडली. या मार्गावर लोकलच्या ५६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दिवसभरात रिक्षा, टॅक्सी सेवाही तुलनेने कमी प्रमाणात चालल्या. 

शहर व दक्षिण मुंबईत बंद शांततेत पार पार पडला. सकाळपासूनच आंदोलक रस्त्यावर उतरल्याने भाजी मार्केटसह सर्वप्रकारकची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. रोज गजबजणारा दादर, भायखळा - घोडपदेव परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. परळ -शिवडी, कॉटनग्रीन, काळाचौकी, माहिम, धारावी दादर, वरऴी, भागात आंदोलकांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद केली. मात्र काही ठिकाणी रिक्षा - टॅक्सीही बंद ठेवण्यात आल्याने मुंबईकरांचे हाल झाले.

दादरमध्ये सर्व दुकाने बंद राहिल्याने रोज गजबजणारा दादरमध्ये शुकशुकाट होता. वरऴीत आंदोलक रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. सरकारच्या निषेधार्थ काही आंदोलकांनी मुंडण केले. कॉटनग्रीन, शिवडी, काळाचौकी, लालबाग, चिंचपोकळी परिसरात आंदोलकांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करायला लावली. या भागात कडकडीत बंद होता. सायन-पनवेल महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केल्याने वाहतूक खोळंबली. आंदोलक रस्त्यावर उतरून वाहतूक बंद पाडली. वांद्य्रात दुकाने सुरु राहिल्याने आंदोलकांनी विनंती करून दुकाने बंद करायला लावली. तर आंदोलकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नरीमन पाईंट येथील भाजप प्रदेश कार्यालया जवळ पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. 

सीएसटी - फोर्ट, चर्चगेट परिसरात समिश्र प्रतिसाद -
मराठा आंदोलनामुळे नोकरदार वगळता अनेकांनी घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रोज गजबजणारा सीएसटी, फोर्ट परिसरातील वर्दऴ कमी दिसत होती. येथे टॅक्सी, बसेस सुरळीत होत्या. फॅशनस्ट्रीट, खाऊगल्ली हा नेहमी गजबजलेला परिसर शांत होता. काही ठिकाणी दुकानेही सुरू होती. येथे बंदचा फारसा परिणाम दिसला नाही.

एसटीची ५६ आगारांतील वाहतूक बंद - 
आंदोलनात एसटी बस जाळण्याचा पूर्वानुभव असल्याने महामंडळाने राज्यातील २५० आगारांपैकी ५६ आगारांतील वाहतूक बंद ठेवली होती. त्यात मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ, पनवेल, पालघरचा समावेश असून रायगडसह अन्य भागातील आगारांमधील वाहतूक अंशत: सुरू होती. मुंबई विभागातून दररोज ४१५ फेऱ्या चालविण्यात येतात. परंतु, बुधवारी केवळ २७२ फेऱ्या चालवल्या गेल्या. त्यामुळे महामंडळास आर्थिक नुकसानही सहन करावे लागले.

Post Bottom Ad