गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या १९० वर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या १९० वर

Share This


गुजरात - गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील (Gujrat Morbi bridge collpase) मृतांची संख्या सोमवारी सकाळी १९० वर पोहोचली आहे. त्यात २४ मुले आहेत. मृतांमध्ये महिला आणि वृद्धांचाही समावेश आहे. १७० जणांची सुटका करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता ७६५ फूट लांब आणि अवघ्या ४.५ फूट रुंद झुलता केबल पूल कोसळून ही दुर्घटना घडली. १४३ वर्षे जुना हा पूल ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आला होता.

गेल्या ६ महिन्यांपासून हा पूल बंद होता. नुकतीच त्याची दुरुस्ती करण्यात आली. २५ ऑक्टोबर रोजी तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. रविवार असल्याने गर्दी वाढली. यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक (०२८२ २२४३३००) जारी केला आहे. जखमींवर उपचारासाठी मोरबी आणि राजकोटच्या रुग्णालयात आपत्कालीन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. एनडीआरएफ अधिका-याने सांगितले की, त्यांनी पहिल्यांदाच इतके मृत्यू पाहिले आहेत. नदीच्या गढूळ पाण्यात माणसे शोधणे अवघड होत आहे. पुलाखालीही मृतदेह अडकले असण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

१४० वर्षांहून जुना पूल -
मोरबीचा हा झुलता पूल १४० वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे ७६५ फूट आहे. हा झुलता पूल गुजरातच्या मोरबीचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. ते १८८० मध्ये त्यावेळी सुमारे ३.५ लाख खर्चून हा पूल उभारण्यात आला होता. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते. तेव्हापासून या पुलाचे अनेकवेळा नूतनीकरण करण्यात आले. नुकतेच दिवाळीपूर्वी दोन कोटी रुपये खर्चून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.

गर्दीमुळे पुल कोसळला -
गेल्या ६ महिन्यांपासून हा पूल बंद होता. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून नुकतेच त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाची क्षमता सुमारे १०० लोकांची आहे, मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्यावर सुमारे ५०० लोकांची गर्दी झाली होती. हेच अपघाताचे कारण ठरले. मोरबीचे भाजप खासदार मोहन कुंडारिया यांनी भास्करला सांगितले की, पूल कोसळल्यामुळे लोक जिथे पडले तिथे १५ फूट पाणी होते. या घटनेनंतर गुजरात सरकार खडबडून जागं झालं आहे. सरकारने तातडीने पावलं उचलत या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये पाच जणांचा समावेश असेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages