आरेचे जंगल कागदावर आणि सिमेंट काँक्रिटचे जंगल मुंबईत - आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 October 2023

आरेचे जंगल कागदावर आणि सिमेंट काँक्रिटचे जंगल मुंबईत - आशिष शेलार


मुंबई - तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले आणि प्रत्यक्षात मुंबईत काय "करुन दाखवले?" तर मुंबईत बिल्डरांना ‍प्रिमियमची खैरात करुन सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे करुन दाखवले. त्याचे परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागत असल्याची टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी पुन्हा केली आहे.
 
मुंबईच्या हवा प्रदुषणात वाढ झाली असून गतवर्षी प्रमाणे याही वर्षी मुंबईतील हवेतील प्रदुषात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्वाला जबाबदार तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत, असा आरोप आहे.
 
या बाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की,  मुंबईत आरेला जंगल घोषीत केले आणि स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतली. पण ही घोषणा कागदारवर असून प्रत्यक्षात उबाठाकडून मुंबईत बिल्डरांसाठी गेल्या 10 वर्षांत सुमारे 38 हजार 999 झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिली.  बिल्डरांना "प्रिमियमचे खतपाणी" घातले त्यामुळे आजघडीला 6 हजार बांधकाम प्रकल्प एकाचवेळी सुरु झाले, त्यामुळे मुंबईत "सिमेंटचे जंगल" उभे केले.  जी मेट्रो वाहनांची संख्या कमी करुन हवा प्रदुषण कमी करणार आहे ती मेट्रो आणि तीच्या कारशेडचे काम उबाठाने रोखून ठेवले. मुंबईतील कचऱ्यापासून गॅसची निर्मिती केली तर सुमारे 350 कोटी रुपयांचा नैसर्गिक गॅस मुंबईला उपलब्ध होईल, पण त्यासाठी एक रुपयाचीही तरतूद केली नाही. उलट गरज नसताना पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाची तयारी सुरु केली.
 
तसेच माहुलच्या प्रदुषणकारी कंपन्या स्थलांतरीत करण्याची मागणी आहे,  पण तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उबाठा सरकारने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला 14 हजार कोटींच्या दंडात सवलत देऊन तो 300 कोटींवर आणला आणि त्यालाही स्थगिती दिली. कंपन्याना न्यायालयीन प्रक्रियेत मदत होईल अशी भूमिका घेतली आणि माहुलमधील "प्रदुषणाच्या भट्ट्या" धगधगत्या ठेवल्या.  याबाबत  आपण मागिलकाळात विधानसभेचे लक्ष वेधून सरकारकडे चौकशीचही मागणीही केली होती. अशा प्रकारे मुंबईत आज जे प्रदुषण होते आहे त्याला उबाठा आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad