![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyPLu7Ofk0LwNYHtRI5_FzOL9c_o1Vur2i_mmDbKG4bXhnXm2erot_5vs0t2tpzD4vVnuatzqOFROZftttDVnnVT5mlw6Th2NCHrcm3i9rZ7re0gde89H9jXkQ0DbpqXusrNyRso-XnueG4H9whOdlByylllM3uS1W5oyo3Hma7n1VXW1DzwQpI0tc5Ka8/w640-h480/bmc%20head%20office%20(1).jpg)
मुंबई - मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा खासगी असो किंवा शासकीय, अशा बांधकामांना रोखण्यात येईल, असा सक्त इशारा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे. धूळ व प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोमवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रसारित करण्यात येतील, त्यांचे पालन सर्व घटकांनी व यंत्रणांनी करणे आवश्यक राहील, अन्यथा कोणताही मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ताकीदही चहल यांनी दिली आहे.
वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक २० ऑक्टोबर २०२३) संपन्न झाली. या बैठकीला प्रधान सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, बांधकामे व विकास क्षेत्रातील क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या संघटनांच्या प्रतिनिधींची हजेरी होती.
या बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल म्हणाले की, पावसाळा संपून जेमतेम दहा पंधरा दिवस उलटत नाही तोच मुंबई प्रदेशात व मुंबई महानगरात देखील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याची दखल केंद्र व राज्य शासनाने देखील घेतली असून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवेतील प्रदूषण वाढण्यामागे धूळ हा एक मोठा घटक ठरतो आहे. बांधकाम व्यवसाय अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक असला तरी त्यामध्ये धूळ प्रतिबंधक उपाययोजना करणे, प्रदूषणास कारणीभूत इतरही घटकांना नियमांनुसार कार्यवाही करायला लावणे, यासाठी मुंबईतील सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय राखून तातडीने व सक्तीच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई प्रदेशातील इतरही महानगरपालिका व संबंधित संस्थांची तातडीने बैठक घेवून उपाययोजनांना गती द्यावी, असे आवाहन चहल यांनी केले.
सद्यस्थितीत मुंबईत सुमारे ६ हजार बांधकामे स्थळं आहेत, ही बाब लक्षात घेता धूळ तसेच प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वं सोमवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रसारित केली जातील. त्यासह अस्तित्वातील सर्व नियम आणि परिपत्रकांप्रमाणे यंत्रणा व उपाययोजना प्रत्यक्ष कार्यान्वित झालेली आढळली पाहिजे, अन्यथा त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करुन चहल यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले.
बांधकामांबाबत सूचना-
• एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे.
• एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी / पत्रे/ कापडांचे आच्छादन असावे.
• प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी तुषार फवारणी (स्प्रिंकलर) यंत्रणा असावी आणि धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान ४-५ वेळा पाण्याची फवारणी करावी.
• प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र (ऍण्टी स्मॉग मशीन) बसवावे.
• मुंबईतील रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धूळ प्रतिबंधक यंत्र (ऍण्टी स्मॉग मशीन) वाहने कार्यान्वित करण्यात येतील.
• प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.
• मेट्रो, रस्ते, उड्डाणूपल आदी शासकीय निर्माणाधीन कामाच्या ठिकाणीही ३५ फूट उंचीच्या आच्छादनांसह तुषार फवारणी व धूळ प्रतिबंधक संयंत्रांची व्यवस्था असावी.
• मेट्रो रेल्वेची बांधकामे सुरु असणाऱया ठिकाणी संबंधित यंत्रणांनी परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देवून आपल्या अखत्यारित सर्व उपाययोजना कराव्यात.
• इमारती अथवा कोणतेही बांधकाम पाडतानासुद्धा आजुबाजूने आच्छादन करुन नंतरच बांधकाम पाडावे, जेणेकरुन धूळ पसरणार नाही. तसेच सर्व नियमांचे पालन केले जावे.
• धूळ निर्माण होईल असे कोणतेही बांधकाम पूर्णत: झाकलेलेच असावे.
• बांधकामासाठी लागणारे मार्बल, दगड, लाकूड आदींची कटाई, ग्राइंडींग आदी कामे बंदिस्त भागात किंवा आच्छादन असलेल्या भागातच करावी.
• बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या संरक्षणासाठी मास्क, चष्मा आदी संरक्षण साहित्य दिले जावे.
बांधकामासाठी वापरली जाणारी वाहने-
• बांधकाम साहित्य तसेच राडारोडा (डेब्रीज) ने-आण करणारे वाहन झाकलेले असावे. तसेच, वाहनांची वजन मर्यादा पाळावी, या वाहनांत मर्यादेपेक्षा अधिक वजन वाहून नेऊ नये.
• बांधकाम राडारोडा (डेब्रीज) ने-आण करताना, प्रत्येक खेपेच्या वेळी तुषार फवारणी करावी. तसेच वाहनांची चाके प्रत्येक खेपेनंतर धुवून स्वच्छ केली जावी.
• वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेत नाही, तसेच वाहनांच्या चाकांची प्रत्येक खेपेनंतर व्यवस्थित स्वच्छता केली जात आहे, याची खातरजमा व्हावी, यासाठी प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावे.
• बांधकामांशी संबंधित प्रत्येक वाहनाची पीयूसी चाचणी वेळेवर झालेली आहे, हे निश्चित करावे. चाचणी झाली नसल्याचे आढळून आल्यास त्यावर परिवहन विभागाने तत्काळ कारवाई करावी.
• बांधकामातील राडारोडा तसेच टाकाऊ साहित्यांची वाहतूक काळजीपूर्वक केली जावी. बेजबाबदारपणे आणि इतरांना घातक ठरेल, अशाप्रकारे वाहतूक चालवणाऱ्यांवर विशेष पथकाच्या माध्यमातून कडक कारवाई केली जावी. दंडासोबत कायदेशीर कार्यवाही करावी.
• काही ठिकाणी रात्रीच्या वेळी राडारोडा वाहतूक करुन निर्जन ठिकाणी टाकून दिल्याचे आढळून येते. अशा प्रकारांना रोखण्यासाठी पथकांची स्थापना करावी, या पथकांनी रात्री गस्त करुन अशा वाहनांवर थेट कारवाई करावी.
उद्योग व व्यवसायांसाठी सूचना-
• मुंबईतील वीज, ऊर्जा, गॅसविषयक मोठ्या प्रकल्पांतून होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्याकडून कसोशीने प्रयत्न व्हावेत. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व उपाययोजना त्यांनी केल्या आहेत किंवा कसे, याची फेरतपासणी करावी.
• या प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या यंत्रणांची भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात करावी. महानगरपालिकेच्या यंत्रणेने देखील फेरतपासणी करुन रिफायनरींच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची खात्री करावी. माहूल सारख्या परिसरांमध्ये यापुढे नियमितपणे व सक्तीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व संबंधित यंत्रणांची असेल. अन्यथा, त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल.
विशेष पथकाकडून पाहणी-
• महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत येणाऱया बांधकाम ठिकाणांची पाहणी करण्यासाठी विशेष पथकं गठीत करावीत.
• प्रत्येक विभागात किमान ५० पथकांची नियुक्ती करता येईल. या पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेटी देवून थेट व्हिडिओ चित्रिकरण करावे. तसेच उपाययोजनांमध्ये काहीही कमतरता आढळून आल्यास थेट जागेवरच नोटिस देवून अशी बांधकामे लगेच रोखावीत (स्टॉप वर्क).
• सर्व सहायक आयुक्तांनी आपल्या अखत्यारित पदपथ व इतर ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी देखील धूळ प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.
• विहित कालमर्यादेपेक्षा अधिक जुन्या अशा डिझेल आधारित वाहनांना प्रवेशास बंदी आहे, त्याअनुषंगाने याची पाहणी राज्य परिवहन विभागाच्या माध्यमातून कटाक्षाने करण्यात यावी.
• मुंबईतील प्रत्येक रस्त्यांची स्वच्छता करताना धूळ कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे पथक पाहणी करतील.
• तसेच, मुंबई महानगरातील अतिशय वर्दळीच्या किमान ५० ते ६० रस्त्यांवर वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र (ऍण्टी स्मॉग मशीन) नियमितपणे पाठवून दररोज भल्या पहाटे / सकाळी फवारणी करावी, जेणेकरुन रस्त्यांची स्वच्छता होवून धूळ रोखता येईल.
No comments:
Post a Comment