मुंबईमधील मधुमेहामुळे मृत्यूचे प्रमाण ४८५ टक्क्यांनी वाढले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईमधील मधुमेहामुळे मृत्यूचे प्रमाण ४८५ टक्क्यांनी वाढले

Share This

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांमध्ये वाढ होत आहे. २०१४ ते २०२३ या दहा वर्षांतील रुग्णालयीन नोंदीचा अभ्यास केल्यानंतर मधुमेहांसारख्या आजारांनी होत असलेल्या मृत्यूंची संख्या ४८५ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. मृत्यूंच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वात वरचे कारण आहे, असे प्रजा फाऊंडेशन संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

प्रजा फाऊंडेशन संस्थेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, मुंबईत गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक रुग्ण हे डायरिया किंवा अतिसार (९ लाख ३६ हजार ६१), क्षयरोग (३ लाख ८९ हजार ८०३), उच्च रक्तदाब (३ लाख ७० हजार ७९५), मधुमेह (३ लाख ७० हजार ८१) आणि डेंग्यू (१ लाख ३९ हजार ८९२) याप्रमाणे आहेत. २०१४ ते २०२२ या काळात झालेल्या मृत्यूंच्या कारणांचा विचार केला असता त्यात मधुमेह, श्वसनाचे गंभीर आजार, क्षयरोग आणि उच्च रक्तदाब यांचा क्रमांक लागतो. जीवनशैलीशी निगडित मधुमेहासारख्या आजारांनी २०१४ मध्ये २,४२८ मृत्यू झाले, तर २०२२ पर्यंत ते १४ हजार २०७ वर पोहोचले. ही वाढ ४८५ टक्के आहे.

प्रजाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, जीवनशैलीशी निगडित मधुमेहासारखे आजार आटोक्यात आणण्यासाठी शहरी नियोजन आणि विकासाच्या संदर्भात भारत सरकारचे शहरी आणि प्रादेशिक विकास योजना आखणी आणि अंमलबजावणी (यूआरडीपीएफआय) धोरण दिशादर्शक ठरते. त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेने केली पाहिजे. व्यक्तीचे आरोग्य आणि रोजच्या शारिरीक हालचालींकरिता शहरात दरडोई किमान १० चौरस मीटर खुली जागा उपलब्ध असली पाहिजे, अशी शिफारस या धोरणात आहे. मात्र मुंबई विकास आराखडा २०१४ ते २०३४मध्ये दरडोई केवळ तीन चौरस मीटर खुली जागा प्रस्तावित केली आहे. ही मोकळी जागा वाढविली पाहिजे. नागरिकांसाठी पायाभूत सुविधा सुद्धा वाढवल्या पाहिजेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages