
मुंबई - ‘सत्याचा मोर्चा’च्या व्यासपीठावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सत्ताधारी महायुतीवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. मतदार याद्यांमधील घोळ उघड करत त्यांनी आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुबार-तिबारवाले मतदार आढळल्यास तिथेच फोडून काढा असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
राज ठाकरे म्हणाले, “आज मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. काहींचं वय १४ तर वडिलांचं १४३ दाखवलं आहे. कुणाची नोंद आयुक्तांच्या बंगल्यावर, तर कुणाची सुलभ शौचालयात आहे. हे कसले प्रकार आहेत? हे निवडणुका आहेत का विनोद?”
ते पुढे म्हणाले, “एक आमदार स्वतः सांगतो की २० हजार मतं बाहेरून आत आणली. म्हणजे हा सत्तेचा माज आहे. हे लोकशाहीचा अपमान आहे. निवडणूक आयोगात काही लोक घुसले आहेत, जे सत्ताधाऱ्यांना जिंकवून देतात.”
राज ठाकरेंनी यावेळी जनतेला आवाहन केलं की, “घराघरात जा आणि मतदार याद्यांतील घोळ लोकांना दाखवा. जर निवडणुकीच्या वेळी दुबार-तिबार मतदार दिसले, तर त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करा. अन्यथा हा प्रकार थांबणार नाही.”
राज ठाकरेंनी या मोर्चात मतदार याद्यांतील अनियमिततेचे पुरावे दाखवत, “हजारो मतदारांनी दुबार मतदान केलं आहे, आणि ही लोकशाही धोक्यात टाकणारी परिस्थिती आहे,” असा गंभीर आरोप केला. “मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अन्यथा महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरेल,” असा इशाराच त्यांनी दिला.
त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवीन राजकीय घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांनी एकत्र येऊन मतदार याद्यांतील घोळाचा मुद्दा पुढे नेल्याने निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढण्याची चिन्हं आहेत.

No comments:
Post a Comment