
मुंबई - हिमाचल प्रदेशातील काँग्रेस शासनाखालील एका सरकारी शाळेत ८ वर्षांच्या दलित विद्यार्थ्यावर मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांकडून झालेल्या अमानुष व जातीय छळाची संतापजनक घटना उघड झाली आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत सत्ताधारी पक्षांवर थेट निशाणा साधला आहे.
अत्याचाराची धक्कादायक माहिती
माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हा दलित समाजातील असून त्याला शाळेत वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात होती. मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांकडून त्याच्यावर सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. मारहाणीच्या एका प्रसंगी विद्यार्थ्याच्या कानातून रक्त येऊ लागले. त्याहून अमानुष प्रकार म्हणजे — आरोपी शिक्षकांनी त्या बालकाच्या पॅन्टमध्ये जिवंत विंचू ठेवला.
त्याशिवाय, शाळेत नेपाळी आणि दलित विद्यार्थ्यांना उच्च जातीच्या विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जाते, असा आणखी एक धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रातील जातीय भेदभावाचा विद्रूप चेहरा पुन्हा एकदा समोर आणला आहे.
“सत्ताधीश बदलतात, पण दलितांची वेदना कायम” -
या घटनेवर प्रतिक्रिया देताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगवेगळे मुखवटे घालतात, पण जातीय व्यवस्थेचीच सेवा करतात. मतांसाठी दलितांच्या सन्मानाचा व्यापार करतात. एकमेकांवर ओरडतात, पण दलित अत्याचारातील त्यांची मिलीभगत तीच आहे.”
ते पुढे म्हणाले, “सत्ताधीश बदलतात, पण दलितांची वेदना कायम राहते. आता दलित समाजाने बाबासाहेबांनी दाखवलेला नवा मार्ग स्वीकारून स्वतःचा राजकीय पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे.”
न्यायाची मागणी व कारवाईची अपेक्षा
या प्रकरणावर तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याचे कळते.
संपूर्ण देश हादरला -
अल्पवयीन दलित विद्यार्थ्यावर झालेल्या या क्रूर अत्याचाराने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षण क्षेत्रातील सुरक्षितता आणि सामाजिक समानतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments:
Post a Comment