मुंबई (जेपीएन न्यूज) - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायतसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार झाली. या पत्रकार परिषदेला राज्य निडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे, सचिव सुरेश काकाने, उपसचिव सुर्यकृष्ण मूर्ती, उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे
निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया -
नगर परिषद आणि नगर पंचायत यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करत आहोत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात ही 10 नोव्हेंबर 2025 पासून होईल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशन पत्राची 18 नोव्हेंबर 2025 ला छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत ही 21 नोव्हेंबर 2025 असेल. अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025 असेल", अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
"निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ही 26 डिसेंबर 2025 ला जाहीर होईल. मतदानाचा दिवस हा 2 डिसेंबर 2025 असेल आणि मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025 असेल. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस हा 10 डिसेंबर 2025 असेल", अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
निवडणूक आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मार्फत हा संदेश पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ही पत्रकार परिषद फक्त नगर परिषद आणि नगर पंचायती संदर्भात आहे. राज्यातील पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 86859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. 246 नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्वाचित नगरपरिषदांचा समावेश आहे. 236 नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.
राज्यात एकूण 147 नगरपंचायती आहेत. त्यापैकी 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 15 नवनिर्वाचित आहे. तर 27 नगरपंतायतींची मुदत यापूर्वी संपलेली आहे. उर्वरित 105 नगरपंतायतींची मुदत समाप्त झालेली नाही.
नगर परिषदांची सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगर पंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे. नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्य पद्धतीने आहे. साधारण एका प्रभागामध्ये दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात. पण नगर परिषदेचा सदस्य संख्या विषम असेल तर एका प्रभागात तीन जागा असतात. साधारणत: मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागेल. याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष राहील त्याच्यासाठी देखील मतदान करावं लागेल. नगर पंचायतीमध्ये एक सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. त्यामुळे तिथे मतदारांना 2 मते द्यावी लागतील.
जात वैधता प्रमाणपत्राबाबत -
नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाने निर्माण केलेल्या संकेतस्थळावर स्वीकारले जातील. एका प्रभागाम्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. यासोबत जात वैधता प्रमाणपत्र आवश्यकता आहे. ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती जमा करावी लागील. पण असा उमेदवार निवडून आला तर त्याला निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र देणं आवश्यक राहील.
नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदान केंद्र निहाय मतदान याद्या 7 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवली -
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. अ वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी 5 लाख आणि अध्यक्ष पदासाठी 15 लाख, ब वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार आणि सदस्य पदासाठी 3 लाख 50 हजार, क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार आणि सदस्य पदासाठी 2 लाख 50 हजार. नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार अशी खर्चाची मर्यादा आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम होईपर्यंत आचारसंहिता असेल.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्व राजकीय पक्षांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मुद्दे, विकासाचे दावे आणि जनतेच्या अपेक्षांवर आधारित चुरशीची लढत रंगणार असून, राज्यात पुन्हा एकदा लोकशाहीचा रंगतदार मेळा भरू लागला आहे.

No comments:
Post a Comment