भांडुप रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भांडुप रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

Share This

मुंबई - भांडुप रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला की चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

या दुर्घटनेत वर्षा सावंत (२५), मानसी मेघश्याम गुरव (४९), प्रशांत शिंदे (५३) आणि प्रणिता संदीप रसम (३५) यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींमध्ये नारायण भिकाजी कांबळे, मंगेश मुकुंद दुखांडे, ज्योती विष्णू शिर्के, प्रशांत दत्ताराम लाड, शीतल प्रकाश हाडवे, दिनेश विनायक सावंत, पूर्वा संदीप रसम, प्रताप गोपाळ कोरपे, रवींद्र सेवाराम घाडीगावकर आणि रामदास शंकर रूपे यांचा समावेश असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. जखमींवर एम. टी. अग्रवाल रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, सायन रुग्णालय, मिनाज हॉस्पिटल आणि फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. ट्वीटद्वारे त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना केली आहे. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages