
मुंबई - राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काँग्रेसने अखेर महापालिका निवडणुकांत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे या दोन्ही पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेषतः ही चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडणुकीचे निकाल जाहीर न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, असेही या पक्षांनी म्हटले आहे. या याचिकेवर हायकोर्ट कोणता निर्णय देते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. येत्या 15 तारखेला मतदान होणार असून, 16 तारखेला निकाल घोषित होणार आहे. पण राज्यात जवळपास 67 ठिकाणी सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव व काँग्रेस नेते समीर गांधी यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या याचिकेद्वारे राज्य निवडणूक आयोगाच्या तटस्थतेवरही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशीची मागणी...
महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांना पैसे देऊन प्रसंगी दबाव टाकून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्यात आले. लोकप्रतिनिधित्व कायद्यात बिनविरोध निवडीची कोणतीही संकल्पना नाही. या कायद्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे बिनविरोध विजयी उमेदवारांना पडलेल्या मतांची किमान टक्केवारी निश्चित केली जावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोग राज्य सरकारच्या दबावाखाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, त्या प्रकरणाची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करण्यात यावी. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडणुकीचे निकाल जाहीर न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
कुठे निवडून आलेत बिनविरोध उमेदवार?...
कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचे सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यात भाजपच्या 15, तर शिवसेनेच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे. जळगावमध्येही सत्ताधारी भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी 6 असे एकूण 12 उमेदवार कोणत्याही निवडणुकीशिवाय निवडून आलेत. याशिवाय भिवंडीत भाजपचे 6, तर शिवसेनेचे 2 असे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.
दुसरीकडे, ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 7, पनवेलमध्ये भाजपचे 6, तर 1 अपक्ष असे 7 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. अहिल्यानगर येथे भाजपचे 3, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार बिनविरोधात आलेत. धुळ्यातही भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेत. तर पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झालेत. मालेगावातही इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.

No comments:
Post a Comment