
मुंबई - मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष शिंदेसेनेची सत्ता असून ही महायुती मुंबईकरांच्या मुलभूत समस्या सोडण्याकडे पहिल्या दिवसापासूनच दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. महानगरपालिकेच्या पहिल्या सभेत सादर करण्यात आलेल्या २७ प्रस्तावांमध्ये तब्बल २० प्रस्ताव हे रस्ते, चौक व इतर कामांचे नामांतर करण्याचे आहेत. हे प्रस्ताव पाहता भाजपा महायुतीचे कशाला प्राधान्य आहे, हे दिसून येत आहे, असा हल्लाबोल महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी केली आहे.
महायुतीच्या कारभाराचा पंचनामा करत काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी पुढे म्हणाले की, मुंबई महानगरात सध्या सर्वात जास्त महत्वाचे प्रश्न हा प्रदुषण, वाहतुक कोंडी, पिण्याचे पाणी हे आहेत. प्रदुषणामुळे मुंबईकरांना श्वास घेणे अवघड झाले आहे, विशेषतः लहान मुले व वयस्कर नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. श्वसनाचे विकार बळावत चालेले आहेत, यावर आधी चर्चा करायला हवी. मुंबईकरांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. सर्व फुटपाथवर अतिक्रमण झालेले आहे. मेट्रोची कामे वर्षानुवर्ष सुरुच आहेत. रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले असल्याने बांधकाम, मेट्रोची कामे आणि रस्त्यावरील खड्डे यातून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिण्याची पाणी, मुंबईकरांची आरोग्य सुविधा, झोपडपट्टीतील नागरिकांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे, पण त्याकडे महायुतीने लक्ष दिल्याचे दिसत नाही.
पहिल्याच कामकाजातून महायुतीची मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी असलेली तळमळ दिसायला हवी पण तसे होताना दिसत नाही. काँग्रेस पक्ष मुंबईकरांच्या प्रश्नावर महायुतीला जाब विचारेल. मुंबईकरांना विकास हवा आहे, त्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक गप्प बसणार नाहीत, असेही काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अश्रफ आझमी यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment