
मुंबई - संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, गोरगरीब रुग्णांची सेवा आणि निवाऱ्याच्या कार्याला दिलेला प्राधान्यक्रम आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा व जीवन संदेशाचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी केले.
संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरातील गाडगेबाबा धर्मशाळेत सोमवारी (२३ फेब्रुवारी २०२६) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत संत गाडगे महाराजांच्या कार्याची आठवण करून दिली.
महापौर म्हणाल्या की, “गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा संदेश कृतीतून दिला. त्यांच्या कार्यामुळे मी प्रभावित झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून नगरसेवक आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाल्यास स्वच्छतेत आपण उच्चांक गाठू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात संस्थेमार्फत आयोजित स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान महापौरांच्या हस्ते रुग्णांना फळे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके, गजाननराव नागे, संस्थेचे एकनाथ ठाकूर, उत्तमराव लोणारकर व अमोल ठाकूर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment