
मुंबई - शहरात वाढत्या प्लास्टिक वापराच्या पार्श्वभूमीवर चहाच्या टपऱ्यांवर वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वेष्टन असलेल्या कागदी कप व थर्माकोल ग्लासवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका पद्मजा आशिष चेंबूरकर यांनी महापालिका सभागृहात यासंदर्भात ठरावाची सूचना मांडली.
चेंबूरकर यांनी आपल्या सूचनेत नमूद केले आहे की, प्लास्टिकचा सर्व स्तरांमध्ये अनियंत्रित वापर होत असून विशेषतः चहाच्या टपऱ्यांवर प्लास्टिक कोटिंग असलेले कागदी कप आणि थर्माकोल ग्लास मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. गरम चहा अशा कपांमध्ये दिल्यास सूक्ष्म प्लास्टिक कण व घातक रसायने चहामध्ये मिसळण्याची शक्यता असते. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन, पचनसंस्थेचे विकार, त्वचारोग तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय वापरून झाल्यानंतर हे कप व ग्लास नाल्यांमध्ये टाकल्यामुळे नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. परिणामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन परिसरात अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या वाढतात. त्यामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील चहाच्या टपऱ्या, उपाहारगृहे आदी ठिकाणी प्लास्टिक वेष्टन असलेले कप व थर्माकोल ग्लास यांच्या वापरावर बंदी घालावी. त्याऐवजी काचेचे ग्लास, स्टीलचे कप किंवा मातीचे कुल्हड यांचा वापर सक्तीचा करावा, अशी मागणी ठरावातून करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment