
मुंबई - ‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त मुंबईत आज (२३ फेब्रुवारी २०२६) सुमारे ६ लाख ६६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी समूहगायन करत अभूतपूर्व विक्रम रचला. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच इतर मंडळांच्या एकूण २,२३४ शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले.
या विक्रमाची अधिकृत नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस् यांच्याकडून घेण्यात आली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांताक्रूझ (पूर्व) येथील महानगरपालिका नारियलवाडी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सकाळी ९ वाजता, तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी दुपारी १ वाजता शाळेच्या परिपाठावेळी हे गीत सादर केले.
उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण व आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचन, वक्तृत्व, चित्रकला, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी तसेच आरोग्य शिबिरांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताचे एकाच वेळी सामूहिक सादरीकरण करण्यात आले.


No comments:
Post a Comment