
मुंबई - चेंबूर येथील सुभाष नगर, इमारत क्रमांक ३६ येथे सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामादरम्यान आज (२८ फेब्रुवारी २०२६) दुपारी भीषण अपघात घडला. उंचावर काम करत असताना सहा मजूर खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका मजुराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
दुपारी सुमारे १२.०५ वाजता या घटनेची माहिती राजावाडी रुग्णालयाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
राजावाडी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामल्लू (वय ५५) यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. गुणधर राय (वय २२) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना MICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. उसराई (३०), रमेश राय (२५), विजय (३५) आणि संदीप (२७) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित वॉर्ड व पोलिसांकडून तपास सुरू आहे. बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव होता का, याचीही चौकशी केली जात आहे.

No comments:
Post a Comment