
मुंबई - शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या शुभेच्छा देताना कोणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपयोगी ठरणारी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा किंवा भेट म्हणून आणाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री राजेश शिरवडकर यांनी केले आहे.
हार - पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षण व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळून आवश्यक मूलभूत साधनांची पूर्तता होणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी शिक्षणात गुंतवणूक करण्याचा हा सकारात्मक व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संदेश असल्याचे शिरवडकर यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बळकटीकरण व्हावे, त्यांना आवश्यक साहित्य वेळेवर मिळावे आणि समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने हे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाला उत्साहाने प्रतिसाद द्यावा, असे राजेश्री शिरवडकर यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment