
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन भांडुप संकुल येथील प्रशिक्षण केंद्रात उत्साहात साजरा करण्यात आला. दिमाखदार आणि शिस्तबद्ध पथसंचलनाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांनी सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या बाबतीत अग्रेसर राहण्याचे आवाहन केले. महानगरपालिकेची कार्यालये, रुग्णालये, जलाशय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा दल प्रभावी सेवा बजावत असून, बदलत्या काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शारीरिक क्षमतेसोबत मानसिक तंदुरुस्तीवरही भर देण्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, गेल्या ६० वर्षांपासून सुरक्षा दलाने अत्यंत जबाबदारीने कर्तव्य बजावले आहे. दलातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून भांडुप येथे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
कार्यक्रमात विविध पथकांनी कवायती सादर केल्या. तसेच, २०२५-२६ या वर्षात विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.

No comments:
Post a Comment