डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळांतील परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळांतील परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण करा

Share This

मुंबई - राज्यातील माध्यमिक शाळांमधील परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी विश्वशांती सामाजिक संस्थेने केली आहे. याबाबत संस्थेच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

संस्थेच्या मते, सध्या शालेय शिक्षण विभागाकडून परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत घेतल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. याशिवाय वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मार्चपासून तापमानात वाढ होत असून एप्रिलमध्ये उष्णतेचा कडाका अधिक तीव्र होतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जावे लागल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

तसेच, एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असताना परीक्षा कालावधीमुळे अडचणी निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

संस्थेने सुचवले आहे की, इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळेल तसेच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणे सोपे जाईल.

या मागणीवर शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages