
मुंबई - भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा जिंकून देशाचा मान उंचावला आहे. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर विजेत्या भारतीय संघाचा बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते आणि नगरसेवक अमेय घोले यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मंगळवारी महापौरांना पत्र देऊन विनंती केली. आपल्या पत्रात घोले यांनी म्हटले आहे की, भारतीय संघाने आपल्या जिद्द, उत्कृष्ट खेळ आणि संघभावनेच्या जोरावर संपूर्ण जगात भारताचे नाव गौरवले आहे. त्यामुळे हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे.
या ऐतिहासिक विजयामुळे देशभरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विशेषतः तरुण पिढीसाठी हा विजय प्रेरणादायी ठरला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई ही देशाची क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या उल्लेखनीय यशाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भारतीय क्रिकेट संघाचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात यावा, अशी मागणीही घोले यांनी पत्राद्वारे केली आहे.
या माध्यमातून मुंबईकरांना भारतीय संघाच्या या अभिमानास्पद यशाचा गौरव करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment