
मुंबई - मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये विशेषतः गोवंडी आणि मानखुर्द परिसरात नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा गंभीर मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी हा प्रश्न उपस्थित करत सरकारने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
नार्वेकर यांनी सांगितले की, काही टोळ्या सरकारी रुग्णालयांमधील नवजात शिशूंची माहिती मिळवून त्यांची विक्री करत असल्याचे समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील काही कर्मचारीच नवजात बालकांच्या नोंदणीची माहिती या टोळ्यांना पुरवत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयातील नवजात शिशूंच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सांगितले की, सरकारी रुग्णालयांमध्ये नवजात शिशूंची गोपनीयता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वतंत्र पोर्टल देखील तयार करण्यात येईल.
याशिवाय नवजात शिशूंची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा थेट संबंध आढळल्यास संबंधित कुटुंबातील सदस्यांवरही गृह विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी दिली.

No comments:
Post a Comment