
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत चालणाऱ्या CBSE शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. भाजपा प्रवक्ता आणि माजी शिक्षण समिती सदस्या आरती पुगावकर (Aarti Pugaonkar) यांनी याबाबत पत्राद्वारे केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर (Rajeshree Rajesh Shirwadkar) यांच्या दालनात संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीस उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर (Prachi Jambhekar), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे (Sujata Khare) तसेच ममता राव (Mamta Rao) उपस्थित होत्या. बैठकीत मनपा CBSE शाळांमध्ये १ एप्रिलपासून शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत तसेच मनपा शाळांशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक आणि विधायक चर्चा करण्यात आली.
आरती पुगांवकर यांनी पाठवलेल्या पत्रात जी-दक्षिण विभागातील शांतिनगर, साने गुरुजी मार्ग येथील मनपा CBSE शाळेत २०२६–२०२७ या शैक्षणिक वर्षात पहिली ते सातवीपर्यंत एकूण सात वर्ग सुरू होणार असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षक एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वी पात्र आणि पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती तातडीने करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच गेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढल्याची बाबही पत्रात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे CBSE अभ्यासक्रमाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी सर्व वर्गांसाठी पात्र आणि पूर्णवेळ शिक्षक असणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बैठकीत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मनपा शाळांमधील शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

No comments:
Post a Comment