
मुंबई - राज्यातील विविध मैदानांवर विशेषतः महिला खेळाडू तसेच नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय अद्याप उपलब्ध नसल्याचा गंभीर मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हा प्रश्न उपस्थित करत महिलांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधले.
मैदानांवर स्वच्छतागृह व चेंजिंग रूमच्या अभावामुळे महिला खेळाडूंना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक महिलांना क्रीडा स्पर्धांपासूनही वंचित राहावे लागते, असे नार्वेकर यांनी नमूद केले.
यावर उत्तर देताना नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, लोकायुक्तांच्या निर्देशानुसार या प्रकरणी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आले आहे. तसेच नगर विकास विभागामार्फत राज्यातील सर्व क्रीडांगणे आणि मैदाने येथे महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भात २४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस संबंधित मंत्री व अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहितीही मिसाळ यांनी दिली.
दरम्यान, राज्यातील महिलांना सुरक्षित व सुसज्ज क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

No comments:
Post a Comment