
मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील अलीकडील बदली प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पक्षाचे प्रवक्ता व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, हे बदली प्रकरण केवळ प्रशासकीय नसून भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचा आरोप केला. बदल्यांमध्ये व्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी “पोस्टिंगसाठी रेट ठरवले जातात आणि राजकीय हस्तक्षेपातून प्रक्रिया प्रभावित होते,” असे म्हटले आहे.
मातेले यांनी नमूद केले की, पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या काही बदल्या अचानक रद्द करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे १२२ बदल्या रद्द होणे ही प्रक्रिया संशयास्पद असल्याची अप्रत्यक्ष कबुली असल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांसह राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच बदली प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने राबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांवर अद्याप संबंधित प्रशासन किंवा राज्य सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास आणि घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment