
मुंबई - पावसाळ्यापूर्वी पश्चिम उपनगरांतील नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. त्यांनी आज कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला.
डॉ. शर्मा यांनी दहिसर येथील पायल हॉटेल जंक्शन, रिव्हर व्ह्यू ब्रिजजवळील दहिसर नदी, जयवंत साळवी मार्गावरील मलजल प्रक्रिया केंद्र, म्हात्रे नाला, पोईसर नदी तसेच लालजी पाडा परिसरातील गाळ उपशाच्या कामांची तपासणी केली.
महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नाल्यांतील कचरा व गाळ काढण्याच्या कामांना वेग देण्यात आला असून, ३१ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच काढण्यात आलेल्या गाळाची वेळेत विल्हेवाट लावावी व तो पुन्हा रस्त्यावर किंवा नदीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते गणेश खणकर, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, लीना देहरकर, नगरसेविका योगिता पाटील, अंकिता यादव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment