
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ Jishnu Dev Varma यांच्या हस्ते लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, सायन येथे उत्साहात पार पडला. ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत मुंबईतील झोपडपट्टी व दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये क्षयरोग निर्मूलनावर विशेष भर देण्यात येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान सायन MARD च्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी निवासी डॉक्टरांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच युवा डॉक्टरांनी सामाजिक आरोग्य उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. त्यांच्या संवादामुळे उपस्थित डॉक्टरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘निक्षय मित्र’ उपक्रमातील योगदानाबद्दल मा. महापौर Ritu Tawde यांच्या हस्ते राज्यपालांचा विशेष सन्मान करण्यात आला.
“मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आणि डॉक्टरांचा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच हे अभियान यशस्वी होईल,” असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी “शुभं करोति कल्याणम्, आरोग्यं धनसंपदा” हा संदेश देत समाजाच्या आरोग्य व कल्याणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
सायन MARD चे उपाध्यक्ष डॉ. रवि सपकाळ यांनी, “‘टीबी मुक्त मुंबई’ हे अभियान केवळ आरोग्यविषयक उपक्रम नसून सार्वजनिक आरोग्य अधिक सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमाला उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन, आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड, आमदार सुनील शिंदे, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, सायन MARD चे पदाधिकारी आणि निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment