
मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील बससेवा तीन दिवस विस्कळीत राहिल्याने मासिक बसपासधारकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांनी बेस्ट प्रशासनाकडे मासिक बसपासांना किमान तीन दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
विश्वासराव यांनी २६ जून २०२६ रोजी वाहतूक (प्रवर्तन) विभागाचे सहा. महाव्यवस्थापक रमेश मनोहर मडवी यांना पत्र पाठवून ही मागणी केली. १९ जून ते २१ जूनदरम्यान झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे मासिक बसपासधारकांना त्यांच्या पासचा नियमित वापर करता आला नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुंबईकर नागरिक मोठ्या प्रमाणावर बेस्ट बससेवेवर अवलंबून आहेत. संपामुळे हजारो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला, तसेच बसपासधारकांचे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यामुळे सर्व वैध मासिक बसपासधारकांना किमान तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विश्वासराव यांनी केली आहे. यामुळे प्रवाशांना न्याय मिळेल आणि बेस्ट उपक्रमावरील त्यांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment