
मुंबई, २४ जून : मान्सूनने मुंबईत दमदार हजेरी लावत शहर आणि उपनगरांना अक्षरशः झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्री ११ ते पहाटे ३ या अवघ्या पाच तासांच्या कालावधीत मुंबईला जून महिन्यातील सरासरी पावसाच्या तब्बल ५२ टक्के पाऊस मिळाला. त्यामुळे अनेक भागांत जलभराव झाला असून यंदाच्या हंगामातील पहिला तिहेरी आकड्याचा (Triple Digit) पाऊस मुंबई आणि नवी मुंबईत नोंदवला गेला.
गेल्या २४ तासांत मालवणी येथे सर्वाधिक ३४२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ परळमध्ये ३३४ मिमी, मालाडमध्ये ३१३ मिमी, पवईत २९४ मिमी, वडाळा आणि दादरमध्ये प्रत्येकी २९० मिमी पाऊस झाला.
कांदिवलीत २८४ मिमी, मरोलमध्ये २६५ मिमी, मानखुर्दमध्ये २६२ मिमी, वर्सोवा आणि कांजूरमार्गमध्ये २६० मिमी, चेंबूरमध्ये २५८ मिमी, तर बोरीवलीत २५७ मिमी पावसाची नोंद झाली. वांद्रे (२५४ मिमी), आरे (२४९ मिमी), कुलाबा आणि अंधेरी (२४८ मिमी) तसेच जोगेश्वरी (२४४ मिमी) येथेही मुसळधार पाऊस कोसळला.
मालबार हिल (२४३ मिमी), भायखळा आणि गोवंडी (२४० मिमी), मुंबई सेंट्रल, वरळी आणि विक्रोळी (२३९ मिमी) तसेच घाटकोपर (२३३ मिमी) आणि सायन (२३१ मिमी) परिसरातही जोरदार पावसाची नोंद झाली.
नवी मुंबई परिसरात बेलापूर (२२८ मिमी), कोपरखैरणे (१७४ मिमी), नेरुळ (१३४ मिमी), वाशी (११४ मिमी) आणि खारघर (१०० मिमी) येथे मुसळधार पाऊस झाला. ठाण्यात ७८ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.
मुसळधार पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचले, तर रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.


No comments:
Post a Comment