
मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली असून अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा, पाणीवाटप आणि पाण्याच्या वापराबाबत दीर्घकालीन व प्रभावी नियोजन तातडीने करावे, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रभाकर शिंदे यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा काटेकोर आणि नियोजनबद्ध वापर करण्यात यावा, तसेच भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुंबईसारख्या महानगरात पाणीपुरवठा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच या विषयावर सविस्तर चर्चा होण्यासाठी तो गटनेत्यांसमोर विचारार्थ ठेवावा, अशी विनंतीही प्रभाकर शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे.


No comments:
Post a Comment