
मुंबई, २४ जून : सायन येथील प्रतीक्षा नगर परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या ड्रेनेज कामांनंतरही पहिल्याच जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक भाजपा नेतृत्त्वाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष लवू नर यांनी या प्रकरणाची पोलखोल करत प्रशासनाकडे जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.
प्रभाग क्रमांक १७३ मधील प्रतीक्षा नगर परिसरात पावसाळ्यातील जलभरावाची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद ठेवून मोठ्या ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले होते. या कामामुळे भविष्यात या भागात पाणी तुंबणार नसल्याचा दावा स्थानिक भाजपा नगरसेविका शिल्पा दत्ता केळुस्कर आणि दत्ता केळुस्कर यांनी केला होता.
मात्र, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर या परिसरात पूर्वीपेक्षाही अधिक प्रमाणात पाणी साचल्याचा आरोप मनसेने केला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना दिलासा मिळाला नसल्याने या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
लवू नर यांनी सांगितले की, या संदर्भात माटुंगा एफ-उत्तर विभाग कार्यालयातील सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. जनतेच्या पैशातून करण्यात आलेल्या कामांचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्यास त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
दरम्यान, या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास स्थानिक नागरिकांसह जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.


No comments:
Post a Comment