मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम; ऑरेंज अलर्ट, तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकल उशिराने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम; ऑरेंज अलर्ट, तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकल उशिराने

Share This

मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ३ : मुंबईत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोर कायम ठेवला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरींसह ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ८ या २४ तासांत शहर विभागात १२६ मिमी, पूर्व उपनगरात ११० मिमी आणि पश्चिम उपनगरात ११४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गिका सुरू असल्या तरी लोकल गाड्या विलंबाने धावत आहेत. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते २० मिनिटे उशिराने धावत असून, पावसामुळे कमी झालेल्या दृश्यमानतेचा त्यावर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल ५ ते १० मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.

दरम्यान, आज दुपारी २.१८ वाजता ४.२८ मीटरची उच्च भरती येणार असून, शनिवारी पहाटे २.०९ वाजता ३.६८ मीटरची आणखी एक उच्च भरती अपेक्षित आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी आणि मच्छीमारांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हवामान विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पाणी साचलेल्या भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages