
मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ३ जुलै :
मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान विभागाने (IMD) ४ आणि ५ जुलैसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
शुक्रवारी दुपारी १२.५६ वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या हवामान अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ४ व ५ जुलै रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यासाठीही या कालावधीत रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ जुलै रोजी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ७ जुलैपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम आणि रेल्वे सेवांमध्ये विलंब होत आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


No comments:
Post a Comment