1/1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येणारे, आशा-आकांक्षांची पूर्तता करणारे तसेच महाराष्ट्राला व्यसनमुक्तीकडे घेऊन जाणारे ठरो, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात पुढे म्हणतात की, येणारे नवीन वर्ष हे आपल्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी मिळालेली आणखी एक संधी आहे. या नवीन वर्षात आपल्यापैकी प्रत्येकाने नवनवीन संकल्प करुन ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी यावर्षी आपल्याला अनेक महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत, ज्यावेळी असे निर्णय घेण्याची वेळ येईल, त्या प्रत्येक वेळी महाराष्ट्रातील जनता अचूक निर्णय घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पुरोगामी आणि प्रगतशील ही ओळख कायम ठेवतानाच भविष्यात आपली वाटचाल ही व्यसनमुक्त महाराष्ट्राकडे असली पाहिजे, त्यातूनच निरोगी आणि सुदृढ नवी पिढी निर्माण होणार आहे, असे सांगून येणाऱ्या नवीन वर्षात ‘व्यसनमुक्त महाराष्ट्रा’च्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment