मुंबई : मुंबई काँग्रेसचे माजी सरचिटणीस अजित सावंत यांनी आमआदमी पक्षात गुरुवारी प्रवेश केला. सावंत यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे संजय तिवारी, रोहिदास लोखंडे, डॉ. रॉबर्ट डिसुझा, अँड़ शकील, दत्ता सोनावणे, सुभाष भोईर आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी आपमध्ये प्रवेश केला. यामुळे लोकसभा निवडणुकी अगोदर मुंबई काँग्रेसला धक्का बसला आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांचे हात भ्रष्टाचारात बरबटले आहेत. केंद्रात आणि राज्यात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या काळात नव्याने उदयाला आलेला आमआदमी पक्ष भ्रष्टाचार, महागाई आणि इतर समस्या सोडवू शकतो. या कारणास्तव आपण आमआदमी पक्षात प्रवेश केल्याचे सावंत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेते सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये तिकीट वाटपात भ्रष्टाचार, अभद्र युती आणि आमदारांच्या नातेवाइकांना तिकिटे देण्यात आली. पक्षासाठी तळमळीने कार्य करणार्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षातील वरच्या पदावरील नेतेमंडळी डावलत असल्याची भावना निर्माण झाली. पक्षातील श्रेष्ठींच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवल्यामुळे माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. जवळपास दोन वर्षे पक्षातून बाहेरच होतो. आमआदमी पक्षात प्रवेश करणार असल्याचे कळताच पक्षश्रेष्ठींकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता काँग्रेसला कायमचा रामराम केला असल्यामुळे पुन्हा जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे सावंत म्हणाले.


No comments:
Post a Comment