मंत्र्यांच्या बंगल्यांची थकबाकी शून्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 May 2014

मंत्र्यांच्या बंगल्यांची थकबाकी शून्य

मंत्र्यांच्या मलबार हिल येथील सरकारी बंगल्यांना दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या बिलापोटी एक वर्षासाठी मुंबई महापालिकेने ३८ लाख रुपये रक्कम आकारली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आर. आर. पाटील, छगन भुजबळ आदी बऱ्याच मंत्र्यांनी ती भरल्याने त्यांच्या नावावर शून्य थकबाकी आहे. मात्र भुजबळ, डॉ. पतंगराव कदम, अनिल देशमुख, जयंत पाटील, शिवाजीराव मोघे, राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यांची वॉटर रीडिंग मशिनच बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कोणत्या निकषावर ही बिले आकारली गेली याबद्दल शंका घेण्यात येत आहे.
चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारात हा तपशील मिळविला आहे. एप्रिल, २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीतील पाणीबिलांची थकबाकी भरण्यात आली नव्हती, असेही स्पष्ट झाले आहे. मात्र त्याच्या विपरित २०१३ ते २०१४ या कालावधीसाठी सुमारे ३९ लाख रुपयांच्या थकबाकीपैकी बरीचशी रक्कम भरण्यात आल्याची सरकारी खात्याला 'न शोभणारी' घटना घडली असून, केवळ ३८ हजार रुपये थकबाकीच उरली आहे. किरकोळ थकबाकीदारांमध्ये अनिल देशमुख, शिवाजीराव मोघे, जयंत पाटील यांचा समावेश आहे. त्याच्या अगोदरच्या वर्षी मंत्री अनिल देशमुख यांनी सर्वाधिक साडेचार लाख रुपये व त्यापाठोपाठ हर्षवर्धन पाटील यांनी १८ लाख, ५० हजार थकबाकी ठेवल्याचे आढळून आले आहे. मार्चपर्यंत शून्य थकबाकी असणाऱ्यांमध्ये राज्यपालांच्या राजभवनासह हर्षवर्धन पाटील, मनोहर नाईक, राजेंद्र दर्डा, जयदत्त क्षीरसागर, नारायण राणे, अजित पवार, शिवाजीराव देशमुख, सुनील तटकरे या मंत्र्यांचा सरकारी बंगल्याचा ही समावेश आहे.

सरकारी बंगल्यांची देखरेख सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केली जाते. पण या खात्याच्या कार्यालयाचेच पाणीपुरवठा रीडिंग मीटर बंद असल्याची माहिती हाती आली आहे. १ एप्रिल, २०१४पर्यंत या कार्यालयाची सुमारे ११ लाख रुपये एवढी थकबाकी असल्याचे निदर्शनाला आले आहे. मीटर बंद असतानाच बिले आकारली जात असल्याने थकबाकी कमी की, जास्त याबाबतही शंका आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS