
मुंबई - राज्यात 30 मार्चपासून मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे.
31 मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता असली तरी हवामान अस्थिर राहू शकते. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान पुन्हा पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात ठिकठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. वादळी वारे आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव जनावरांची काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत झाडाखाली, टिनशेडखाली तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांजवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment