
मुंबई JPN NEWS - गणेशोत्सवाच्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा, घटक चाचण्या किंवा महत्त्वाच्या मूल्यांकन प्रक्रिया घेऊ नयेत, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका ॲड. तुलिप ब्राईन मिरांडा यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
याबाबत २ सप्टेंबर रोजी भुसे यांना पत्र देण्यात आले. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून मुंबईतील अनेक विद्यार्थी व पालक या काळात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात. तसेच अनेक विद्यार्थी कुटुंबीयांसोबत गणेशोत्सवासाठी मूळ गावी जातात.
अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांवर शैक्षणिक व मानसिक ताण निर्माण होऊन त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्सवात सहभागी होण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. शैक्षणिक नियोजनावर परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक असल्यास या परीक्षा गणेशोत्सवानंतर ऑक्टोबर महिन्यात घेण्यात याव्यात, अशी मागणी मिरांडा यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment