
मुंबई JPN NEWS - काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, रविवार १३ सप्टेंबर रोजी मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळी ७ वाजता जारी करण्यात आलेल्या Nowcastनुसार पुढील तीन तासांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींसह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
IMDच्या अंदाजानुसार, काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगडव्यतिरिक्त पुणे, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांनाही आजच्या Nowcastमध्ये यलो अलर्टच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईत मान्सूनने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. IMDच्या माहितीनुसार मुंबईत सध्या हलका पाऊस सुरू असून वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे.
पावसासोबत विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी झाडे, जाहिरात फलक आणि विजेच्या खांबांजवळ थांबणे टाळावे, तसेच प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment