तोडफोड झालेल्या 'अमर जवान ज्योत'ची महापौरांकडून पाहणी
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर पालिकेतर्फे शिवसेना खासदार भारतकुमार राऊत यांच्या खासदार निधीतून 1857 स्वातंत्रयुद्ध स्मारक 21 ऑगस्ट 2009 रोजी उभारण्यात आले होते. सन 1857 च्या स्वातंर्त्ययुद्धात इंग्रजांनी मुंबईतील मंगळ गडीया व सय्यद हुसेन यांना आताच्या आझाद मैदानात तोफेच्या तोंडी देऊन देहान्त शासन केले होते. 1857 च्या स्वातंर्त्ययुद्धातील हुतात्म्यांचे मुंबईकरांना तसेच मुंबईत येणार्या पर्यटकांना स्मरण व्हावे म्हणून पालिका मुख्यालयासमोर 'अमर जवान ज्योत' हे स्मारक उभे करण्यात आले. 1857 च्या युद्धातील हिंदू-मुस्लिम ऐक्यावर प्रकाश टाकण्याचा हेतू ठेवून हे स्मारक उभारण्यात आले होते.
या स्मारकासाठी खासदार भारतकुमार राऊत यांनी आपल्या खासदार फंडातून 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणार्या या स्मारकाला समाजकंटकांनी लक्ष्य करून तोडफोड केल्यामुळे सर्व स्तरातून याचा निषेध होत आहे.?मुंबई : शनिवारी 'रझा अकादमी'ने काढलेल्या मोर्चाच्या वेळी समाजकंटकांकडून पालिका मुख्यालयासमोरील स्वातंर्त्ययुद्ध स्मृती स्मारकाची मोठय़ा प्रमाणात नासधूस करण्यात आली. या ठिकाणी सोमवारी महापौर सुनील प्रभू यांनी भेट देऊन पाहणी केली.
पालिका मुख्यालयासमोर असणार्या या स्मारकामागे सर्व भारतीयांच्या भावना असून या ठिकाणचा क्रांतिकारकांचा स्तंभ उखडला गेला आहे, तर जवानांची प्रतीकात्मक रायफल चोरीला गेली असल्याचे महापौरांनी सांगितले. मात्र या स्वातंर्त्ययुद्ध स्मृती स्मारकाच्या आमच्या भावना तीव्र असून त्यामुळेच पालिकेच्या खर्चाने हे स्मारक येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश आपण दिले आहेत. या स्मारकाचे काम यापूर्वी ज्या कंपनीने केले त्याच कंपनीला हे काम दिले जाणार असून रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी काही मुस्लिम समाजकंटकांकडून एका मुस्लिम स्वातंर्त्यवीराचे स्मारक तोडले जाणे, ही घृणास्पद बाब असल्याचेही महापौरांनी सांगितले. दरम्यान, या स्मारकाची पाहणी करताना महापौरांसह उपमहापौर मोहन मिठबावकर, सभागृह नेते यशोधर फणसे, अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी, उपायुक्त वसंत प्रभू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment