आंबेडकर स्मारकाबाबत सरकारची टोलवाटोलवी
मुंबई - दादरच्या चैत्यभूमडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला गती देण्यासाठी आपण लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊ असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नावर पुन्हा टोलवाटोलवी सुरू ठेवली आहे. या स्मारकासाठी समुद्रकिनार्यालगत असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी सरकारला अडचणी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिकन पक्षाचे आनंदराज आंबेडकर यांना सांगितले.
आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सीआरझेडच्या नियंत्रणात असलेली ही जमीन ताब्यात घेण्यासाठी मार्ग शोधण्यात येईल. हे स्मारक उभारण्यासाठी सर्वांचे एकमत असून स्मारकाचा खर्च राज्य शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्याची सध्याची परिस्थिती पाहता या स्मारकासाठी आंदोलन करू नये, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यावेळी केले. पंतप्रधान येत्या १८ तारखेला मुंबईत येत आहेत. त्यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी करावी असे पाटील यांनी सुचवले. पंतप्रधानांच्या मंुंबई भेटीच्या आधी दिल्लीत त्यांची भेट घेऊन स्मारकाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या स्मारकासंदर्भात शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत केंद्राला अहवाल पाठवला असल्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी यावेळी सांगितले. बैठकीला रिपाइंचे काशीनाथ निकाळजे, राजेंद्र गवई, अविनाश महातेकर आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment